जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२६ । गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघालेल्या जळगावकरांसाठी महत्वाची बातमीचा आहे. जिल्ह्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली असतानाच आता अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आजपासून (१८ एप्रिल) आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ते २१ एप्रिल दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला होता. त्यानंतर मात्र तापमानाचा पारा प्रचंड वाढला आणि नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या.जळगावचे तापमान शुक्रवारी ४२.३ अंशांवर राहिले. मात्र, असे असले तरी भासमान दोन अंशांपेक्षा अधिक म्हणजेच ४४ अंशांच्या पुढे होते. त्यामुळे उन्हाच्या झळा असह्य झाल्या.
दरम्यान आता जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, अवकाळीमुळे उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्याचा तापमानावर परिणाम होणार नाही. उलट तापमान दोन अंशांपर्यंत वाढ होऊ शकते. आगामी दोन तीन दिवस तापमान ३९ ते ४३ अंशापर्यंत राहण्याची शक्यता असून रात्रीचे किमान तापमान हेही ३० अंशांवर पोहोचणार आहे.








