जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२५ । जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम असून आज देखील काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाडा भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आठ जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता असून, विदर्भातील काही शहरांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस होणार आहे. यावेळी जोरदार वारेही वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडचिरोली, गोंदिया, अकोला, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम आणि भंडारा या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, राज्यावर काही दिवस अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार आहे.
जळगावात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
जळगाव शहरासह जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सुमारे एका तासात ४.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. वाऱ्याचा वेग ताशी ५० किमीपर्यंत असल्याने पडझड झाली आहे. या वादळामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान सध्याच्या अवकाळीमुळे तापमानात घसरण झाल्याने उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला. दरम्यान ८ ते १२ मे दरम्यान, ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तापमान ३६ ते ४१ डिग्री सेल्सियस दरम्यान राहणार असले तरी, सततचे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे उष्णतेचा त्रास तुलनेत कमी होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली.