जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । भारतीय हवामान विभागाकडून देशातील ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानचा पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सरासरी इतका कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांच्याकडून पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात या काळात सरासरीच्या ९५ ते १०५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असाही अंदाज आयएमडीच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, जुलै महिन्यात हवामान विभागाकडून दुसऱ्या पंधरवाड्यात मोठा पाऊस होईल अशा अंदाज दुसऱ्या मॉडेलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला. भारतीय हवामान विभागाकडून हा एक नवा प्रयोग केला जात आहे. ज्यात दर महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तवला जातो आहे. ज्याचा ह्यावर्षी हा पहिलाच प्रयोग आहे.
ऑगस्ट महिन्याचा अंदाज बघितला तर कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी सरासरी गाठताना बघायला मिळत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीत देखीलसरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.