⁠ 
रविवार, मे 19, 2024

आम्ही कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेत नाही उलट जे आणलं ते छाती ठोकपणे सांगतोय : आ. राजूमामा भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ । पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भोईटे नगर रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्यांचे बोर्ड पिंप्राळ्यात लावण्यात आले असून या बोर्डवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ना.गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, आ. राजुमामा भोळे यांचे नावे टाकण्यात आले असून महापौर, उपमहापौर, आयुक्तांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यावरुन उपमहापौर यांनी आ.राजुमामा भोळे हे सदर कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता.

यावर आमदार भोळे यांनी जश्यास तसे उत्तर दिले आहे. याबाबत आमदार राजू मामा भोळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित निधी हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणला गेला आहे. त्यावेळी स्वतः उपमहापौर कोणत्या पक्षात होते हे त्यांनी आठवावे. कालांतराने मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांना मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांनी हा निधी रद्द केला. आम्ही पाठपुरावाकडून हा पुन्हा आणला. विधानसभेत मागणी मी केली. पालकमंत्र्यांशी मी बोललो. म्हणून हा निधी परत आला. आम्ही कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेत नाही उलट जे आम्ही आणलं ते छाती ठोकपणे सांगतोय.

उपमहापौरांनी काय केला होता आरोप ?
जळगाव महापालिकेला शासनाकडून दि. १६ ऑगस्ट २०१८ रोजी शंभर कोटीच्या निधी मंजुर झाला. त्यापैकी ३८ कोटीचा निधी खर्चाची मान्यता मिळाली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत हा निधी मंजुर झाला असून यात ३० टक्के हिस्सा हा मनपास अदा करावा लागणार आहे. सदरील रस्त्याच्या निधीच्या संदर्भात पीडब्ल्यूडी विभाग यांच्याकडेस १५ कामांना तांत्रिक मंजुरी मिळणे करीता मनपाने दि. २२ जुलै २०१९ रोजी १९ लक्ष रुपये फी भरली तेव्हा तांत्रीक मान्यता मिळाली. त्यानुसार निविदा प्रक्रीया झाली. दि. १५ मे २०२१ अन्वये महासभा ठराव क्रं. ५२२ नुसार तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राव्दारे रस्त्यांचे काम जलदगतीने होणेसाठी विनंती केली होती.त्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास विभागातील अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी, मनपा अधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष ९ कोटींचा निधी प्राप्त झाला व मनपा हिश्याचा ५ कोटींचा निधी मनपाने पीडब्ल्यूडीला दिल्यामुळे प्रत्यक्ष सुरु झाली. या सर्व प्रक्रीयेमध्ये आ. राजुमामा भोळे यांचा कुठलाही सहभाग व पाठपुरावा नसतांना त्या रस्त्यांवर त्यांच्या नावाचे फलक लावुन श्रेय घेऊ पाहात असल्याचा आरोप उपमहापौर यांनी केला होता.