जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२५ । यंदाच्या पावसाळ्याचे दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला, तरी अद्याप जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाहीय. मागच्या काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी कमी असली तरी, जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसह मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती दिलासादायक आहे.

२० जुलैपर्यंत जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून ४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे, जो गेल्यावर्षीच्या याच दिवसाच्या २७ टक्के साठ्यापेक्षा जास्त आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची मोठी चिंता तूर्तास दूर झाली आहे. तसेच आगामी दोन महिन्यात सरासरी इतकाही पाऊस जिल्ह्यात झाला तरीही पाण्याची चिंता मिटणार आहे. नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक सातत्याने सुरू आहे आणि ते ५५ टक्के भरले आहे.

जिल्ह्यात पाऊस कमी, तरी प्रकल्पांमध्ये चांगलं पाणी का?
जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये २० जुलैपर्यंत दिलासादायक जलसाठा आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात पावसाची सरासरी पाहिली तर कमी पाऊस झाला आहे. तरी धरणांमधील समाधानकारक जलसाठा का..? असा प्रश्न निर्माण होत असला तरी, त्याचे मुख्य कारण जिल्ह्यात जरी पाऊस कमी झाला असला तरी या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे. गिरणेचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात, यासह हतनूर व सुकी धरणाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या मध्यप्रदेशातही चांगला पाऊस झाल्याने या धरणांमध्ये चांगला जलसाठा आहे.
जिल्ह्यातील मोठया धरणातील जलसाठा :
गिरणा धरण – सध्या ५५ टक्के.. गेल्या वर्षी ११ टक्के
वाघूर धरण – सध्या ६५ टक्के.. गेल्या वर्षी ६३ टक्के
हतनूर धरण – सध्या २६ टक्के.. गेल्या वर्षी ३३ टक्के
मध्यम प्रकल्पातील जलसाठा
सुकी – ९८ टक्के
अभोरा – ६९ टक्के
मंगरुळ- ४२ टक्के
मोर – ६३ टक्के
शेळगाव- ०६ टक्के
अंजनी – ४० टक्के
गूळ – ३० टक्के
मन्याड – ११ टक्के
तोंडापूर – ८ टक्के
अग्नावती – 00
बोरी – 00
हिवरा- ०४ टक्के
भोकरबारी- ००







