जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । गेल्या काही दिवसापूर्वी गुलाब चक्रीवादळाने महाराष्ट्रातील काही भागांना झोडपून काढले होते. आता गुलाब नंतर राज्यात नव्या जवाद चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने विदर्भ वगळता सर्वच जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील जवळपास दीड महिन्यांपासून पाऊस कोसळत आहे. सुरुवातीला मान्सूनने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग संकटात आला होता. परंतु गेल्या काही दिवसापासून पाऊस कोसळत असल्याने आता शेतकऱ्यांसमोर पिकांच्या नुकसानीचे संकट उभे आहे.
दरम्याम, आज विदर्भ वगळता सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत पुण्यासह घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान वेगवान वारे देखील वाहणार आहेत, त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यात अशीच स्थिती कायम रहाणार असून हळुहळू पूर्वेकडील जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.