⁠ 
सोमवार, मे 6, 2024

शेतकऱ्यांची चिंता वाढणार ! महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे संकट, जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२४ । फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू होताच देशासह महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळतोय. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण. त्यातच राज्यातील तापमानात वाढ झाल्याने उन्हाची चाहूल लागली. त्याचवेळी हवामान विभागाने चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. नागपूरसह विदर्भ, मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे.

दरम्यान, जळगावातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या जिल्ह्यातील तापमानात चढ उतार दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील किमान तापमान १४.५ अंशांवर होते. मात्र शुक्रवारी ते पुन्हा १३ अंशांवर आले. अर्थात, वातावरणात किंचित गारठा जाणवत होता, पण असे अरसले तरी येत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात कुठे-कुठे पडणार पाऊस?
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करत राज्यातील पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती शेअर केली आहे. होसळीकर यांच्या माहितीनुसार, राज्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारी गडगडाटी वादळांवर सोबत विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोबत वादळी वारे वेग 30-40 किमी प्रति तास जालना , हिंगोली आणि परभणी जिल्हे येथे घडण्याची शक्यता, असं होसळीकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

शेतकऱ्यांची चिंता वाढली
दरम्यान, हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असून यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, काढणीला आलेला हरभरा, तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.