⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

दुर्दैवी : ३ आठवड्यांचाच झाला संसार, शर्थीचे प्रयत्न करूनही नववधूने घेतला जगाचा निरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । विवाहानंतर अवघ्या ३ आठवड्यातच दुःखाचा डोंगर कोसळला, विवाहाला तीन आठवडे होत नाही तोच मेंदूतील रक्तस्त्रावाने नववधूचे निधन झाल्याची दुःखद घटना रावेर येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


अधिक माहिती अशी की, रावेर येथील रहिवासी असलेल्या अंकुश सावदेकर (रा. वाणी गल्ली ) हे यावल येथील न्यायालयात नोकरीला आहेत. १७ एप्रिलला त्यांचा विवाह नशिराबाद येथील दिलीप वाणी यांची कन्या गौरी यांच्याशी संपन्न झाला. विवाहानंतर पती- पत्नी वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनालाही गेले. मात्र, ३० एप्रिलला गौरीच्या मेंदूत रक्तस्राव झाला आणि ब्रेन हॅमरेजमुळे तिचा उजवा हात आणि पाय निकामी झाला. जळगाव येथे उपचारानंतर गौरीला मुंबई येथील नायर इस्पितळात हलविण्यात आले. भक्कम आर्थिक स्थिती नसतानाही अंकुश यांनी उपचाराचे आणि पत्नीला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. काही समाज बांधवांनीही त्यांना मदत केली. परंतु गुरूवारी (५ मे) मध्यरात्री त्यांचे मुंबईत इस्पितळात निधन झाले.

तीन आठवड्यांचा संसार

अंकुश सावदेकर यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले असून त्यांच्या आई येथील अंगणवाडीत सेविका म्हणून काम करतात. जेमतेम आर्थिक स्थिती असताना विवाहानंतर अवघ्या ३ आठवड्यातच दुर्देवी घटना घडल्याने येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईहून रात्री उशिरा त्यांचे पार्थिव रावेर येथे आणण्यात येऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.