जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. अजित दादांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला असून राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी ही अत्यंत धक्का देणारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रच या घटनेने शोकसागरात बुडाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणातील स्पष्टवक्ता आणि धडाडीचे नेतृत्व होते. चार दशकापासून त्यांनी राज्याच्या राजकारणावर ठसा उमटविला होता. अनेक राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांची ज्यावेळी भेट व्हायची.

त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील शेती, सहकार याविषयी नेहमीच ते माहिती घ्यायचे. सकाळी 6 वाजता सर्वसामान्यांना भेटणारा नेता म्हणजे अजित पवार. प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून दादांची ओळख होती. शेतकर्यांसाठी संघर्ष यात्रेचे नेतृत्व त्यांनी केले होते. अजितदादांच्या निधनाचे वृत्त हे मनाला चटका लावणारे असून राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही.

- डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार






