जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. याच दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगानगर येथे आज दुपारी शेतात काम करत असताना विजेचा अचानक फटका बसून तिघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला असून चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लखन दिलीप पवार (वय 14 वर्षे, रा. कोंगानगर), दशरथ उदल पवार (वय 24 वर्षे, रा. कोंगानगर), समाधान प्रकाश राठोड (वय 9 वर्षे, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असं मयतांचे नाव असून दिलीप उदल पवार (वय 35 वर्षे) हे जखमी झाले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव, नायब तहसीलदार महसूल, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला. पुढील मदत कार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.