जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२६ । उज्जैन येथे दर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातला आहे. चाळीसगावमधील कन्नड घाटात कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून यामध्ये नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी एका मित्रांचा ७ जणांचा ग्रुप चारचाकीने जात असताना जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला.

या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला. तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातील जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आहे. मृत तरुणांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या अपघातासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.






