जळगाव लाईव्ह न्यूज । कोरोनानंतर भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे बोलले जात असून यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अशातच केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेत देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लॉकडाऊनच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे स्पष्ट केले. सरकारच्या अजेंड्यावर कोविड-१९ सारखा देशव्यापी लॉकडाऊन करण्याची कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

मध्यपूर्वेतील तणाव आणि इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र भारताची ऊर्जा व्यवस्था मजबूत असून इंधन, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकार आवश्यक उपाययोजना करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहावे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.










