जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२४ । रामदेव वाडी अपघात प्रकरणात कोर्टाने पोलिसांना चांगलंच फटकारलं असून पोलिसांनी १७ दिवस या घटनेचा गांभीर्याने तपास केला नाही म्हणून आज ही वेळ आली आहे, असं म्हणत न्यायालयाने म्हटलं आहे. रामदेव वाडी हिट अँड रन प्रकरणात अटकेत असलेल्या तीन आरोपींवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होऊन तीन दिवसाची मुदत वाढ मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र, यावर न्यायालयाने एका दिवसाची मुदत वाढ देऊन आज शनिवारी जामिनावर आज कामकाज होणार आहे.
दरम्यान या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांना फटकारत त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. गुन्ह्याचे कागदपत्र नाशिक येथे वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याने युक्तिवाद करता येणार नसल्याने आम्हाला तीन दिवसांचा वेळ मिळावा, असा मुद्दा सरकार पक्षाने मांडला. त्यावर बचाव पक्षाने हरकत घेतली. दोन्ही कडील बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने एका दिवसाची मुदत देत शनिवारी कामकाज घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात अटकेत असलेल्या जळगाव शहरातील मोठा बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार, ध्रुव निलेश सोनवणे या तिघांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बीएस वावरे यांच्याकडे कामकाज झाले.
जामीन दिल्यास कायद्याचा वचक राहणार नाही, पोलिसांनी न्यायालयात खुलासा सादर केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून गुन्हा घडल्यापासून रामदेव वाडी व परिसरात समाजात घटनेबाबत जनआक्रोश व तीव्र भावना निर्माण होऊन तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे.