⁠ 
बुधवार, मे 8, 2024

Erandol : बारा तासानंतर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृतदेह सापडला, नेमकी घटना काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२३ । अंजनी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या ६२ वर्षीय शेतकऱ्याचा तब्बल बारा तासानंतर मृतदेह गावाजवळच नदीच्या किनाऱ्यावर सापडला. राजेंद्र भगवान पाटील (वय ६२) असं मृत शेतकऱ्याचे नाव असून याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नेमकी काय आहे घटना?
एरंडोल तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अंजनी नदीला पूर आला होता. हनुमंतखेडे बुद्रुक (ता. एरंडोल) येथील राजेंद्र भगवान पाटील हे शेतातील कामे आटोपून घराकडे जात होते. याच दरम्यान, अंजनी नदीच्या पुलावरून जात असताना त्यांचा पाय घसरल्याने ते पात्रात पडले. राजेंद्र पाटील हे नदीच्या पात्रात पडल्याचे समजताच ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांचा शोध लागला नाही. अंधार असल्यामुळे ते सापडू शकले नाही. सकाळी त्यांचा मृतदेह गावालगतच नदीच्या पत्रात सापडला. त्यांचे पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.