⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

संत गाडगेबाबा.. जळगावकर नगरसेवक, अधिकाऱ्यांना स्वच्छतेची बुद्धी द्या!

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची आज जयंती. ज्यांनी संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश दिला असे संत म्हणजेच गाडगेबाबा. ज्या काळात टू स्टार, थ्री स्टार असे स्टार कोणत्याही शहराला किंबहुना गावांना मिळत नव्हते त्यावेळेस गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन गाव साफ केली, अस्वच्छता दूर केली. आता शहरांना स्टार मिळू लागलेत मात्र स्वच्छता काही दिसत नाहीये.

नुकत्याच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये जळगाव शहराला ‘थ्री स्टार’ पुरस्कार मिळाला याचा गवगवा प्रशासनाने आणि महापौरांनी मोठ्या प्रमाणावर केला. थेट दिल्लीत जाऊन तो पुरस्कार घेऊन आले. मात्र खरंच ‘थ्री स्टार’ मिळावी इतकी पात्रता जळगाव शहराची आहे का? असा प्रश्न जर नागरिकांना विचारला तर 99% नागरिक नक्कीच म्हणतील नाही.

१% असतील जे हो म्हणतील. जे हो म्हणतील ते एक तर लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी वा कर्मचारी. कारण प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंबहुना लोकप्रतिनिधीं व्यतिरिक्त कोणीही सांगेल जळगाव शहर स्वच्छ नाही.

जळगाव शहर स्वच्छ करण्यासाठी ‘वॉटरग्रेस’ असं बलाढ्य नाव असलेल्या कंपनीला जळगाव शहर महानगरपालिकेने ठेका दिला. या कंपनीचं नावच फक्त बलाढ्य आहे बाकी कामाबद्दल न बोललेलं बरं. असं नागरिक म्हणतात.

नुकत्याच झालेल्या खासदारांच्या आढावा बैठकीमध्ये खुद्द आमदार राजूमामा भोळे यांनी देखील वॉटरग्रेसच्या गलिच्छ कारभाराबद्दल तक्रार केली. मात्र उपायुक्त असलेले उदय पाटील यांनी मात्र जळगाव शहरांमध्ये अगदी योग्य स्वच्छता सुरू आहे. चांगल्या पद्धतीने आम्ही स्वच्छता करत आहोत. अशी वॉटरग्रेसची बाजू मांडली.

यावर त्यावेळेस आमदार भोळे चिडले ही गोष्ट वेगळी आहे. मात्र प्रशासनाला खरंच जळगाव शहरात स्वच्छता दिसते का? नक्की असा कोणता चष्मा प्रशासनाने किंबहुना उपयुक्त , आयुक्तांनी घातलेला आहे. जो घातला की सगळ चकाचक दिसत?. खरंच हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे

जळगाव शहर महानगरपालिकेतली एकही अशी महासभा नसते ज्यामध्ये वॉटरग्रेसचा विषय निघत नाही. प्रत्येका महासभेमध्ये नगरसेवक मोठ्या प्रमाणावर वॉटरग्रेसवर तक्रार करतात. मात्र तक्रारी केल्यावर वॉटरग्रेसकडे साधे डोळे वर करून पाहण्याची देखील मनपा प्रशासनाची हिम्मत होत नाही. यामुळे जे चाललंय तस चालू द्या असंच प्रशासन मनातल्या मनात म्हणत आहे. आणि कोणतीही कारवाई न करता दाखवण्यापूर्वी म्हणजे आपल्या हवी तशी स्वच्छता करत आहे. यामुळे स्वच्छ सुंदर जळगाव खरंच होणार का? जर स्वच्छ जळगाव होणार नसेल तर स्वतः गाडगेबाबांना जळगाव शहरात यावं लागणार का?

दर महिन्याला लाखोंच्या रकमेमध्ये वॉटरग्रेस कंपनीला महानगरपालिका बिल अदा करत असते. यावर दंड काही हाजारांचा असतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून घेतलेला कर असा वाया जातोय. आपण पाहू शकतो एकीकडे जळगाव शहर महानगरपालिकडे रस्ते करायला पैसे नाहीत. मात्र वॉटर ग्रेस सारख्या बलाढ्य कंपनीला हवा तेवढा पैसा द्यायला जळगाव शहर महानगरपालिकेकडे पैसा आहत. मात्र या सगळ्यात वाईट इतकाच वाटतं की प्रशासकीय अधिकारी म्हणजेच ‘सरकारी नोकर’ हव्या तश्या पद्धतीने जळगाव शहरातल्या नागरिकांचा पैसा उधवत आहेत.

फक्त प्रशासकीय अधिकारी किंवा सरकारी नोकरच यासाठी जबाबदार आहेत का? तसेहि नाही लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचे प्रतिनिधी ज्यांना आपण नगरसेवक म्हणतो ते नगरसेवक ‘वॉटरग्रेस’ कंपनीकडून महिन्याचे काही पैसे घेऊन गप्प बसायचं काम करतात असाही आरोप मध्ये झाला होता. यामुळे ह्या आरोपाला जर तथ्य नसतं तर नगराचेसेवक नक्कीच वॉटरग्रेस कंपनीवर आवाज उठवू शकले असते. पण काही हातावर मोजण्याइतके इतके नगरसेवक सोडले तर कोणीही वॉटरग्रेस विरोधात साधा उच्चारही काढत नाही.

जळगाव महानगरपालिका म्हणजे आता भकास झाली आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.. मात्र आता जर खरंच जळगाव शहर भकास पासून सुंदर आणि स्वच्छ करायचं असेल तर खुद्द घाडगेबाबांनाच येऊन जळगावत स्वच्छता करावी लागेल असंच म्हणता येईल. ज्यांना खरंच जळगाव स्वच्छ करायचं असेल ते नागरिक, नगरसेवक, आमदार, खासदार जे खऱ्या अर्थाने स्वतःला गाडगेबाबांचे अनुयायी समजतात अशांना हातात झाडू घेऊन उतरावे लागेल. तेव्हा कुठे जळगाव शहर स्वच्छ होईल यात काही शंका नाही. कारण प्रशासनाकडून म्हणजेच सरकारी नोकनोकरांकडून आता अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाच ठरणार आहे.