---Advertisement---
जळगाव जिल्हा

शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध- रोहिणी खडसे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२४ । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या रावेर तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी सुनोदा येथे शेतात झाडाखाली बसलेल्या शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांची उपलब्धता, केळी पिक विम्याची प्रलंबित नुकसान भरपाई, शेती पंपांचा विद्युत पुरवठ्याविषयी येणाऱ्या समस्या रोहिणी खडसे यांच्याकडे मांडल्या.

RK1

यात सध्या पूर्वहंगामी लागवड केलेल्या कपाशी व पेरणी बरोबर इतर पिकांना रासायनिक खते देणे सुरू असून कृषी विभाग मुबलक खते उपलब्ध असल्याचे सांगत आहे परंतु सद्यःस्थितीत युरिया व 10:26:26 ही खते शेतकरी बांधवांना उपलब्ध होत नाही. मिळालेच तर त्यांची लिंकिंग सुरू आहे किंवा शेतकऱ्यांना चढ्या दरात ही खते घ्यावी लागत आहेत.

---Advertisement---

जळगाव जिल्हयात एप्रिल व मे महिन्यात उष्णतेने कहर केला. एप्रिलमध्ये अनेक दिवस ४२ अंश सेल्सिअसवर तापमान होते. तर मे महिन्यातही अनेक दिवस ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान होते. त्याकारणाने अतिउष्णतेने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे फळ पीकविमा योजनेतून २०२३-२४ च्या हंगामात केळी पिकासंबंधी विमा संरक्षण घेतलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४३ हजार ५०० रुपये एवढी विमा भरपाई देय आहे परंतु अद्यापही ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, भारनियमनामुळे पिकांना पाणी देण्यास अडचणी येतात महावितरण भारनियमन वेळेव्यतिरिक्त अवेळी विद्युत पुरवठा बंद करते त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही अशा अनेक समस्या शेतकरी बांधवानी रोहिणी खडसे यांच्याकडे मांडल्या.

त्यावर रोहिणी खडसे यांनी शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच जळगाव जिल्हाधिकारी आणि जळगाव जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन केळी पिक विमा आणि रासायनिक खतांच्या उपलब्धतेविषयी व इतर समस्यांविषयी त्यांना अवगत करून, त्या सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे शेतकरी बांधवांना आश्वस्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमी शेतकरी बांधवांच्या पाठीशी असल्याची व वेळप्रसंगी शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याची रोहिणी खडसे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना ग्वाही दिली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटिल, निंभोरा सरपंच सचिन महाले, गणेश देवगिरीकर आदी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---