⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

सामुहिक विवाह सोहळे काळाची गरज – रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२४ । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे भिमस्टार फाउंडेशन द्वारा बौद्ध धर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 35 जोडपे विवाहबद्ध झाली. याप्रसंगी मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुजन करून अभिवादन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी उपस्थित राहून नवपरिणित जोडप्यांना त्यांच्या भावी मंगलमय, निरामय वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे म्हणाल्या भिमस्टार फाउंडेशनच्या सर्व संचालकांचे या सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाबद्दल अभिनंदन . भिमस्टार फाउंडेशन उचंदा ही संस्था दरवर्षी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करते.

संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद असून प्रत्येक समाजात विवाह सोहळ्यातील वाढत्या अनिष्ठ रूढी आणि पैशांचा व वेळेचा अपव्यय बघता प्रत्येक समाजातील समाजमंडळांनी अशा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली असून, यातून गोरगरीब परिवारातील उपवर मुलामुलींचे विवाह अल्प खर्चात व समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना फाटा देऊन पार पडतात. यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होते या वैचारिक आयोजनाबद्दल भिमस्टार फाउंडेशनच्या संचालकांचे पुनश्च अभिनंदन करते आणि भिमस्टार फाउंडेशनच्या संचालकांकडून भविष्यात असेच समाजहिताचे कार्य निरंतर घडत राहो, अशी सदिच्छा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.