⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

आचारसंहिता शिथिल करून वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई द्या – रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२४ । सध्या कडक उन्हाळा सुरू असुन जळगाव जिल्हयात सूर्यनारायण आग ओकत असल्याने तापमान 45 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचल्याने सर्व जण उष्णतेत होरपळत असताना काल शनिवारला संध्याकाळी मुक्ताईनगर,रावेर, बोदवड तालुक्यात आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असुन शेती शिवार आणि घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

आज रविवारला राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा,चिचखेडा सिम, लहान मनुर,ऐनगाव चिखली येथे नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांना धिर दिला देऊन नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्या संबंधी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या सोबत चर्चा केली. तसेच आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या जळगाव जिल्हयात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असताना काल अचानक आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने मुक्ताईनगर ,रावेर, बोदवड तालुक्यात शेती शिवार घरे व गोठयांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात झालेले वादळ अवकाळी पाऊस, एप्रिल मे महिन्यातील उष्ण तापमानामुळे केळी बागांची हानी होऊन केळीच्या दरात मोठी घसरण झाल्याने आधीच प्रचंड नुकसान सोसत असलेल्या शेतकऱ्यांसमोर काल झालेल्या वादळ आणि अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. केळीसारख्या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले हे पीक क्षणार्धात डोळ्यांसमोर जमिनदोस्त होताना शेतकरी बांधवाना पाहावे लागले यामुळे शेतकरी बांधव हतबल झाले आहेत तसेच अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे व घरांची पडझड झाल्यामुळे संसारपयोगी साहित्याचे नुकसान होऊन संसार उघड्यावर पडले आहेत.

जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गोठ्यात साठवण केलेला चारा भिजल्याने शेतकरी बांधवांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे चिचखेडा सिम येथे वादळाने कडुनिंबाचे झाड उन्मळून जनावरांच्या गोठ्यावर पडल्याने बाळू पाटिल यांच्या बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विद्युत तारा तुटून गोठ्याला आग लागल्याने शेतीपयोगी साहित्य जळून राख झाले आहे. खरिप हंगाम तोंडावर आलेला असुन या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करून प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या सोबत संपर्क साधुन नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदतीचे प्रस्ताव सादर करण्या बाबत तसेच विमा कंपन्यांना निर्देश देण्याबाबत चर्चा केली तसेच सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असुन आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना खरिपाच्या तोंडावर तात्काळ मदत मिळावी यासाठी निवडणूक आयोग आणि सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.