⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

पळासखेडेला पार पडला ‘कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी जागरूकता आणि व्यवस्थापन’ मेळावा

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ ऑगस्ट २०२३। पळासखेडेला नुकताच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. त्यात “कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसत असताना शेतकरी त्याबाबत सतर्क नाहीत, गुलाबी बोंड अळी करीता शेतकऱ्यांनी जागरूक राहीले पाहीजे, त्यामुळे उत्पादन तर कमी मिळेल शिवाय कापसाची गुणवत्ता चांगली मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे.” असे संचालक भागीरथ चौधरी ह्यांनी दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र जोधपूर आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि ह्यांच्या संयुक्त वतीने पळासखेडे (मिराचे) ता. जामनेर येथील दिनेश पाटील ह्यांच्या कापूस शेतामध्ये आयोजीत ‘कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी जागरूकता आणि व्यवस्थापन’ याविषयावरील शेतकरी मिळाव्यात त्यांनी संबोधीत केले. 

त्यांच्या बंधन प्रकल्पात कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाकरीता त्यांच्या संस्थेकडून १२ कापूस शेतकऱ्यांच्या समुहाला ६० एकर कापूस क्षेत्राकरीता जपानी तंत्रज्ञान पी बी नॉट व कामगंध सापळे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा विनामुल्य वापर करण्यात आला. कापूस हे राज्यातील महत्वाचे नगदी पीक असुन कापसाची उत्पादकता खुप कमी आहे. कापूस पीक आता फुल आणि बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे आणि कोठेही कापूस पिकांत कामगंध सापळे लावण्यात आलेले नाही.

राज्यात २०१४ पासुन गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. कापूस लावणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने कापूस पिकाचे आर्थिक नुकसान टाळण्याकरीता कापूस पिकात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनात पिकामध्ये निरीक्षण करून गुलाबाच्या कळी प्रमाणे असणाऱ्या डोमकळ्या तोडून नष्ठ कराव्यात, एकरी ५ कामगंध सापळे लावावेत, निंबोळी अर्काची फवारणी करावी. अंडी नाशक किटकनाशकाची फवारणी करावी, असे विचार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ व कृषिविद्या, विस्तार आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. बी. डी. जडे ह्यांनी मार्गदर्शनात मांडले.

एस.ए.बी.सी.चे शास्त्रज्ञ डॉ.दिपक जाखड ह्यांनी कापूस पिकामध्ये पी बी नॉट चा वापर व कामगंध सापळे कसे लावावेत ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले. जैन इरीगेशन कंपनीचे सामाजीक कार्य खुप कौतुकास्पद आहे. ठिबक सिंचनाचा व्यवसाय करणारी ही कंपनी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीच्या समस्यावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करीत असल्याचे बघून तसेच नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोठं काम जैन इरीगेशन करीत आहे, असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा कृषि विभाग आत्मा चे प्रकल्प संचालक रविशंकर चलवादे ह्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचीही माहीती शेतकऱ्यांना दिली.हे नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खुप उपयुक्त ठरणार आहे ह्या करीता जैन इरिगेशन आणि दक्षिण आशिया जैव तंत्रज्ञान संस्था चे आभार मानताना दिनेश पाटील ह्यांनी मनोगत व्यक्त केले.

ह्या उपक्रमामध्ये समाविष्ठ शेतकरी दिनेश पाटील, भगवान राजपूत, संजय पाटील, देवानंद पाटील, जगन गायके, प्रभाकर पाटील, बळीराम माळी, गोपाळ राजपूत, दिवाकर पाटील, नाना शिंदे, प्रमोद पाटील ह्यांचा सत्कार करण्यात आला. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे, मनोज पाटील, तुषार पाटील, जैन ठिबक वितरक अजय पाटील, सुशांत चतुर (नेरी), पी. के. पाटील (जळके) तसेच परिसरातील कापूस शेतकरी उपस्थित होते.