⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

कॉप्यांचा पाऊस पडलेल्या जळगाव जिल्हात ‘नो कॉपी केस’


जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप। राज्यासह जिल्ह्यात बारावीच्या आणि दहावीच्या बोर्डाच्या पेपरला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्रासपणे कॉप्या सुरू असल्याची बातमी दर दोन दिवसांनी कानावर पडत आहेत. मात्र इतके होऊनही जळगाव जिल्ह्यातील भरारी पथकाला संपूर्ण जिल्ह्यात एकही कॉपी करणारा विद्यार्थी शोधता आला नाहीये. यामुळे भरारी पथक केवळ नावापुरतेच उरले की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेवेळी भरारी पथकाचे नियोजन करण्यात येते. परीक्षेवेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी या भरारी पथकाचे नियोजन केले जाते. मात्र जळगाव जिल्ह्यातील भरारी पथक हे केवळ नावापुरते उरले असून त्यांना जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी करणारा विद्यार्थी आढळून आला नाहीये.

जिल्ह्यात परीक्षे वेळी सर्वत्र सर्रासपणे कॉपी सुरू असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमधून दाखवल्या जात होत्या. जळगाव लाईव्ह ने हि याची विशेष बातमी आपल्या पर्यंत पोहोचवली होती , मात्र धडधडीत फोटो प्रकाशित करून देखील भरारी पथकाला त्यांच्या कामाबाबत कोणतेही गांभीर्य राहिले नसून बोर्डाच्या पेपर वेळेस कुठेही अनुचित प्रकार घडला नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे.