⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

गुलाबराव पाटलांसह पाच मंत्र्यांची हकालपट्टी केल्याशिवाय मंत्रीमंडळ विस्तार नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जून २०२३ | राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौर्‍यात यावर बरीच खलबतेही झाली मात्र अद्यापही मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुलाबराव पाटील यांच्यासह पाच मंत्र्यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या नेत्यांकडून वारंवार दावे केले जात आहेत. मध्यंतरी या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यांशी शिंदे यांनी चर्चा केली. मात्र, अद्यापही हा मंत्रीमंडळ विस्तार खोळंबलेला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही मंत्र्यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

अमोल मिटकरी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वारंवार दिल्लीच्या वार्‍या कराव्या लागत आहेत. कारण अमित शाहांनी सांगितलं आहे की, तुमच्या मंत्रिमंडळातील संजय राठोड, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील या वादग्रस्त मंत्र्यांना आवर घाला किंवा यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही मंत्रीमंडळ विस्तार करणार नाही. म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जात आहेत.

एकनाथ शिंदे जोपर्यंत या पाच मंत्र्यांची हकालपट्टी करत नाहीत. विशेषतः अब्दुल सत्तारांबद्दल केंद्रात प्रचंड नाराजी आहे. देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्ट सांगितलं आहे की, त्यांच्यामुळे भाजपाची प्रतिमाही डागाळली आहे. परवा गिरीश महाजन यांनी एक वक्तव्य केलं. त्यात त्यांनी १० मंत्रीपदं आम्ही देऊ आणि कुणाला मंत्रीपद द्यायचं याचे अधिकार एकनाथ शिंदेंना असतील, असं म्हटलं, असेही मिटकरी म्हणाले.