जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । उच्च न्यायालयाच्या आदेशाने तहसीलदार अनिल गावित यांनी चोपडा येथील साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन, कारखान्याची सर्व बँक खाती सील केली आहे. ही कारवाई समोवारी झाली.
चोसाकाकडे शेतकऱ्यांचे २०१४-१५ च्या हंगामातील ऊसाचे ६०० रुपये प्रतिटन पेमेंट व्याजासह देण्याचे आदेश, उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिले होते. कारखान्यावर महसुली वसूली प्रमाणपत्र प्रमाणे कार्यवाही झालेली असताना, कारखाना सुरू रहावा या प्रामाणिक हेतूने ज्यांनी केस जिंकली त्यांनीच ही कारवाई थांबवण्याची विनंती तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. सोमवारी कोर्टाच्या आदेशाने त्या शेतकऱ्यांची देणे रक्कम २३ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. म्हणून तहसीलदार अनिल गावित यांनी चोसाकाचे बँक खाते व जंगम मालमत्ता सील केली आहे. चोसाकाचे चेअरमन, संचालक यांच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता अटकाव करून ठेवली जाणार आहे. तसेच येणी असलेली रक्कम १३.१३ कोटी रुपये न दिल्यास ती मालमत्ता पुढील आदेश येईपर्यंत ताब्यात राहणार आहे.
दरम्यान, तहसीलदारांनी सील केलेल्या खात्यातील पैसा हा शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहे. यापुर्वीही तत्कालीन तहसीलदार दीपक गिरासे यांच्या काळात साखर विकून शेतकऱ्यांचे पैसे दिले होते. सध्या चोसाका बारामती ऍग्रो या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला आहे. बारामती ऍग्रोचे व्हा.चेरमन सुभाष गुळवे यांनी शेतकऱ्यांचे पेमेंट चोसाकाला दिल्याची माहिती काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषदेत दिली होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी
महसुली थकबाकी बाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शेतकऱ्यांची थकीत रक्कम १३ कोटी १३ लाख मिळावेत, म्हणून समोवारी चोसाकाचे बँक खाते नियमाप्रमाणे सील करण्याची कारवाई करण्यात आली असल्याचे मत तहसीलदार अनिल गावित यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा :
- जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता ; नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
- विधानभवनात जाऊनच सुटू शकतील शिक्षकांच्या अडचणी : अॅड महेंद्र भावसार
- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल
- यावल येथील एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता ; परिसरात खळबळ
- प्रामाणिकपणा ! पाच तोळे सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला केले परत