जळगाव लाईव्ह न्यूज । देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत आहे. गेल्या चार दिवसांपासून सतत होणाऱ्या विलंब आणि उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचा रोष वाढला आहे. गुरुवारीच ५५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे दिल्ली, हैदराबाद, गोवा आणि मुंबई सारख्या प्रमुख विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, आज सकाळपासून दिल्ली विमानतळावर २०० हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, ज्यात १३५ निर्गमन आणि ९० आगमनांचा समावेश आहे. इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात उड्डाणं रद्द झाल्यामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला. यादरम्यान इंडिगो एअरलाइनने एक निवेदन जारी केलं आहे.

काय म्हटलं आहे निवेदनात?

या निवेदनात इंडिगोने म्हटलंय, ‘गेल्या दोन दिवसांत इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये प्रचंड व्यत्यय आला आहे. यामुळे प्रभावित झालेल्या आमच्या सर्व ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो. इंडिगो टीम MOCA, DGCA, BCAS, AAI आणि विमानतळ ऑपरेटर्सच्या मदतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे. परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.’

इंडिगोने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्यावर हवाई वाहतूक मंत्री नायडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कंपनीला आपलं कामकाज तातडीने सुरळीत करण्याचे तसंच भाडेवाढ न करण्याचे निर्देश दिले. विमान रद्द होण्यासंबंधी प्रवाशांना आगाऊ सूचना दिल्या जाव्यात, हॉटेलमध्ये निवासासह प्रवाशांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं नायडू यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांना बजावलं.
नागरी हवाई वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सद्यस्थिती आणि उपाययोजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी इंडिगोने डीजीसीएला सांगितलं की, 8 डिसेंबरपासून विमान उड्डाणांची संख्या कमी केली जाईल, तसंच 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ववत स्थिर विमानसेवा सुरू होईल.










