जळगाव लाईव्ह न्यूज । कृषी विभागाने एक मोठी कारवाई केली. बियाणे आणि खतांची साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील ५ कृषी केंद्रांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले आहेत. यामुळे कृषी केंद्रांमध्ये खळबळ उडाली आहे.

कृषी विभागाने निलंबित केलेल्या परवानाधारकांमध्ये चोपडा तालुक्यातील २, चाळीसगाव, बोदवड व भुसावळच्या प्रत्येकी एका कृषी केंद्रचालकाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासणीत ७ कृषी केंद्रांत गैरप्रकारासह अनियमितता आढळून आली आहे.

जळगाव शहरातील एका नर्सरीची तपासणी केली असता, त्यातील औषधांसह बियाणांच्या साठ्यावरही संशय आहे. त्यामुळे या नर्सरी परवानाधारकाविरोधात सुनावणी सुरू आहे. चोपड्यातील एकाने विनापरवाना खत व बियाणांची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकार कमी केल्याबाबत चर्चेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विधान परिषदेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. यावेळी चर्चेत सदस्य शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला. दरम्यान काही ठिकाणी अनधिकृत ‘एच टी बी टी’ बियाणे जप्त केले असून त्या संबंधित बियाणे उत्पादकावर देखील गुन्हा दाखल केला आहे, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.








