जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२६ । जळगावसह महाराष्ट्राच्या हवामानात गेले काही दिवसांपासून होत असलेल्या चढ उतारामुळे थंडीचा कडाका कमी झाला. ढगाळ वातावरमुळे तापमानाचा पारा वाढला आहे. बुधवारी जळगावचे किमान तापमान १४.८ अंशावर तर कमाल तापमान ३१.५ अंशावर पोहोचला. दरम्यान जिल्ह्यात पाऊस किंवा वादळाची शक्यता पूर्णपणे मावळली असून हवामान कोरडे राहील.

दोन दिवसापूर्वी जळगावात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून यामध्ये शेती पिकांचे मोठं नुकसान झाले. यानंतर काल हवामान स्वच्छ दिसून आले. जळगावचे किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे थंडीचा जोर ओसरला असून उकाडा जाणवत आहे.

दरम्यान जळगावमध्ये पुढील तीन दिवसांत तापमानात चढ-उतार होऊन किमान तापमान १४ ते १५ अंश राहील, ज्यामुळे रात्री आणि पहाटे हलका थंडावा जाणवेल; मात्र कमाल तापमान ३० ते ३३ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने दुपारी हवामान उबदार राहील.

पश्चिमेकडील वारे कमकुवत झाल्याने पावसाचे सावट दूर झाले आहे. उत्तर-पश्चिम वाऱ्यांमुळे थंडी असेल पण ती तीव्र नसेल. दरम्यान, पश्चिमेकडून येणारी हवामान प्रणाली आता कमकुवत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस किंवा वादळाची शक्यता पूर्णपणे मावळली असून हवामान कोरडे राहील.










