जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२६ । गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णता आणि असह्य उकाड्यामुळे हैराण झालेल्या जळगावकरांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्यानं जळगावसह राज्यभरात आजपासून २७ ते २९ मे दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे उकाड्यातून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत होती. मात्र मागच्या काही दिवसापासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा काहीसा घसरला असला तरी उकाडा प्रचंड जाणवत आहे. यामुळे जळगावकर पावसाची प्रतीक्षा करत आहे. अशातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यभरात आज बुधवार, २७ ते २९ मेपर्यंत पावसाची शक्यता असून यात मराठवाड्यात २, मध्य महाराष्ट्रात ३ तर विदर्भात ४ दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगावसह खान्देशातही अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.
हवामानातील बदलामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे तसेच अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.








