जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दमदार हजेरी. यामुळे काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे

जळगाव जिल्ह्यात मागच्या तीन आठवड्यापासून पाठ फिरविलेल्या पावसाने पुनरागमन केलं आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने असह्य उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर खरिपाच्या पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठीही या श्रावण सरी ‘जीवनदायी’ ठरल्या आहेत. रविवारी नंतर सोमवार, २८ जुलै रोजी जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू होती.

या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. विशेषतः कापूस, मका, मूग, उडीद आणि सोयाबीनला याचा फायदा होणार आहे. जुलैच्या सरासरीच्या तुलनेत हा पाऊस अजूनही कमी आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटलेली नाही. दरम्यान यंदा २८ जुलैपर्यंत जिल्ह्यात १०५ मिमी. पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात एकूण १८९ मिमी. पाऊस होतो. त्यामुळे अजूनही जुत जिल्ह्यात ३५ टक्के पावसाची तूट आहे, आता ही तूट ऑगस्ट महिन्यात भरून निघणे अपेक्षित आहे.
हवामानाचा अंदाज काय म्हणतो?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात अजून दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मात्र, ३१ जुलैनंतर पावसाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किरकोळ स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, ६ ते ७ ऑगस्टनंतरच जिल्ह्यात दमदार पावसाचे पुन्हा आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे.








