जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही महिन्यापासून केळीला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र आता केळीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनंतर रमजान ईद व आगामी चैत्र नवरात्रोत्सवाचे पर्व जवळ आल्याने बाजारपेठेत फळांच्या मागणी वाढली असून त्यात खान्देशी केळी सध्या ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. यामुळे केळी दरात क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. यामुळे केळी उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सध्या रमजान ईद महिना सुरु झाला असून याच पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फळांना मोठी मागणी वाढली आहे. त्यातही महागडी व स्वादात कमी पडणारी सफरचंद, खरबूज, टरबूज व द्राक्षांच्या तुलनेत अत्यल्प उपलब्ध असलेली केळीची मागणी झपाट्याने वाढली आहे.

मागणी वाढल्याने केळी भावात प्रति क्विंटल ७०० ते ८०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. सर्वाधिक आवक जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल व मुक्ताईनगर भागांत होत आहे. रावेर तालुक्यातून दररोज ४० ते ५० ट्रकद्वारे केळीमालाची वाहतूक होत होती; आता हा आकडा ९० ट्रकांपर्यंत पोहोचला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा तसेच जम्मू-काश्मीर या भागात मोठ्या प्रमाणावर केळी पाठविली जात असल्याची माहिती समोर आलीय.

इतका मिळतोय भाव?
३१ जानेवारीपर्यंत केळीला प्रति क्विंटल १५०० ते १६५० रु. इतके दर मिळत होते. मात्र यात मागच्या काही दिवसात वाढ झाली. ११ ते १८ फेब्रुवारी केळीला प्रति क्विंटल २०२५ ते २२२५ रुपये इतका दर मिळत आहे. रमजान महिन्यास सुरुवात झाल्यामुळे काही दिवस तरी भावात तेजी राहण्याची शक्यता असून केळीच्या भावातील वाढ ही शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरली आहे






