जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२५ । जळगावसह राज्यावर असलेलं अस्मानी संकट कायम आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही ठिकाणी हाहाकार माजवला असून यामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. दरम्यान बंगालच्या उपसागरातून पुढे सरकलेले कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्रकडे आगेकूच करत असून, हवामानातील या बदलामुळे महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाने जोर धरला आहे. आज सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस अलर्ट देण्यात आला आहे

आज या जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यासह पालघरला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा देण्यात आला आहे. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, असे प्रशासनाकडून सांगितले जातंय.

यलो अलर्ट –
नंदूरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा

जळगाव जिल्ह्यातही पावसाचा धुमाकूळ
तीन-चार दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. चाळीसगाव तालुक्यामधील पाटणादेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगम स्थानावर मुसळधार पाऊस झाला यामुळे पाटणादेवी परिसरात डोंगरी नदीला महापूर आलाय. चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या डोंगरी व तितुर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. शहरातील डोंगरी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान आजपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.








