जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ–जळगाव–मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून, आता भुसावळ–जळगाव दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेला रेल्वेचा सेंट्रल खत प्रकल्प लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी दिली.

महाव्यवस्थापक गुप्ता यांनी शनिवारी भुसावळ विभागाचे वार्षिक निरीक्षण केले. यावेळी डीआरएम कार्यालयातील ‘वसुंधरा’ सभागृहात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान

दरम्यान कोरोना काळापासून बंद असलेली भुसावळ–मुंबई पॅसेंजर तसेच भुसावळ–पुणे पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू झाली नाही आणि रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणतीही नवीन घोषणा किंवा अधिकृत संकेत आलेले नाहीत. प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडून या दोन पॅसेंजर सेवेला तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत. अशातच भुसावळ–मुंबई पॅसेंजर तसेच भुसावळ–पुणे पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची शक्यता नसल्याचे संकेत महाव्यवस्थापक गुप्ता दिले. या गाड्या पुन्हा सुरु होणार नसल्यानं प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. प्रवाशांनी वेळेची बचत करण्यासाठी फास्ट मेल व जलद गाड्यांचा वापर करावा, असे आवाहन महाव्यवस्थापक यांनी केले.
रेल्वे स्थानकांवर तसेच गाड्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध विक्रेत्यांवर पुढील काळात अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती डीआरएम अनुप अग्रवाल यांनी दिली. भुसावळ रेल्वे प्रशिक्षण संस्थेत शंभर कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेबाबत ही घटना दुर्दैवी असल्याचे मान्य करण्यात आले. तसेच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, उपचारासाठी मुंबईहून पथक बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीआरओ स्वप्निल नीला यांनी वंदे भारत ट्रेनच्या कोच दुरुस्तीसाठी भविष्यात भुसावळ शेडचा विस्तार करण्याची शक्यता व्यक्त केली.







