जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये जात आहे. आतापर्यंत नऊ महिन्याचे १३५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला असल्याचं विरोधकांकडून बोलले जात आहे. यातच आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे संकेत दिले आहे. या बदलामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार आहे.

ज्या महिलांची आर्थिक स्थिती चांगली नसेल किंवा त्यांचे उत्पन्न कमी असेल, अशाच महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय.
सरकारच्या तिजोरीवर बोझा पडत असल्याने लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचं म्हणत अजित पवार यांनी राज्यातील महिलांना आश्वस्त केले. अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. मात्र, त्या योजनेच्या निकषात बदल केले जातील. ज्या लाभार्थी महिलांची आर्थिक स्थिती हलाकीची असेल. ज्या महिलांचे उत्पन्न कमी असेल, अशाच महिलांना योजनेचा लाभ मिळेल.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुती सरकारने योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या हप्त्यात वाढ केली जाणार, असल्याची घोषणा केली होती.लाडकी बहीण योजनेच्या लाभर्थी महिलेला सरकार १५०० रुपयांची आर्थिक मदत करते. यात वाढ करत महिलांना २१०० रुपयांचा हप्ता दिला जाईल, असं महायुतीकडून सांगण्यात आलं होतं. महायुती सत्तेत आल्यानंतरही याबाबत अजून कोणताच निर्णय झाला नाहीये. याच दरम्यान या योजनेचा आढावा घेऊन अपात्रांना वगळण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. मात्र,अजित पवार यांनी अपात्रांनाही काहीसा दिलासा दिलाय. जे अपात्र ठरतील त्या महिलांकडून सरकार पैसा परत घेणार नसल्याचंही अजित पवार म्हणालेत.