⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

प्रवाशांसाठी खुशखबर! भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्यांच्या कालावधीत वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । सध्या दहावी-बारावी परीक्षेनंतर अनेक जण कुटुंबासह फिरण्याचा प्लॅन करतात. या दरम्यान, रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने भुसावळ मार्गे धावणाऱ्या काही गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या गाड्यांना मुदतवाढ?
रेल्वे प्रशासनाने बलिया, गोरखपूर, मडगाव, नाशिक बडनेरा या – विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे. बडनेरा-नाशिक ही गाडी चाकरमान्यांसाठी अधिक फायद्याची आहे. मुदतवाढ केलेल्या गाड्यांमध्ये ०१०२५ दादर ते बलिया गाडीची मुदत २९ मार्चपर्यंत होती. ती आता ३० जून २०२४ पर्यंत धावेल. ०१०२६ बलिया ते दादर विशेष गाडीची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. ती आता ३ जुलैपर्यंत चालेल.

तसेच ०१०२७ दादर ते गोरखपूर विशेष गाडी ३१ मार्चऐवजी ३० जूनपर्यंत धावेल. ०१०२८ गोरखपूर ते दादर गाडी २ एप्रिलऐवजी आता २ जुलैपर्यंत चालवली जाईल. ०११३९ नागपूर ते बडनेरा द्वि साप्ताहिक गाडी ३० मार्चऐवजी आता ८ जून २०२४ पर्यंत धावेल. ०११४० मडगाव ते नागपूर द्वि साप्ताहिक गाडी ३१ मार्चऐवजी ९ जूनपर्यंत धावणार आहे.