जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ९ टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. बाजार समितीचे सभापती डॉ. सुनील महाजन यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे बाजार समिती कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. समितीच्या मासिक सभेत ठराव करून भत्ता २२१ टक्के वरून २३० टक्के करण्यात आला.

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांनी केलेल्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात १६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बाजार समितीच्या मासिक सभेत ठराव करून महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना सध्या ग्रेड वेतन व ग्रेड पे वर २२१ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये ९ टक्के वाढ करून आता एकूण महागाई भत्त्याचा दर २३० टक्के करण्यात आला आहे.

शासनाच्या दि. १ जुलै २०२३च्या निर्णयानुसार ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२५ पासूनचे पगार वाढीव महागाई भत्त्यासह अदा करण्याचे आदेश सभापती डॉ. सुनील सुपडू महाजन यांनी दिले आहेत.








