जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२५ । जळगाव राज्यात पाऊस कोसळत असून काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान खात्यानं पुढील पाच दिवसाचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात आगामी चार पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आगामी चार दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मागच्या काही दिवसापासून जळगावसह राज्यात पावसाने दडी मारली होती. पावसाअभावी खरीप पिके धोक्यात आली होती. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. यातच मागच्या तीन दिवसापासून राज्यातील विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यातही शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाला

दरम्यान अरबी समुद्राच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. यातच हवामान खात्याने राज्यात आगामी चार पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार आज रायगड, ठाणे. मुंबई, तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर रत्नागिरी, पालघर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टही हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील आणि मराठवाड्यातीस इतर जिल्हे, खानदेशातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
दरम्यान हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला आजपासून १९ ऑगस्टपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
जळगांव जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमान आकडेवारी (MM
दि 16/8/2025
मुक्ताईनगर -5
अमळनेर-28
यावल -25.3
पाचोरा -72
भडगांव -30
जामनेर -10
पारोळा –
एरंडोल -93
रावेर -6
चोपडा -49
चाळीसगाव -62
बोदवड-25
धरणगाव -89
भुसावळ -17.8
जळगाव -44








