⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

राज्यात पुन्हा वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; जळगावला ‘इतके’ दिवस अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२३ । यावर्षी बदलत्या हवामानाने शास्त्रज्ञांना देखील आश्चर्यचकित केले आहे. फेब्रुवारीच्या मध्यंतरी उष्णतेत वाढ झाली होती. त्यामुळे यंदाच्या उष्णतेने नवा विक्रम केला होता. मात्र त्यानंतर मार्चमध्ये आणि आता एप्रिलमध्ये अधूनमधून होणाऱ्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे आत्तापर्यंत वातावरण जवळपास आल्हाददायक राहिले आहे. मध्येच उष्णता थोडी वाढते, पण त्यानंतरच बदलत्या हवामानामुळे पावसाची प्रक्रिया सुरू होते. मात्र आता हवामान खात्याने (IMD) या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यात मागचे चार दिवस पावसाने उघडीप दिली होती परंतु पुन्हा वादळी पाऊस आणि गारपिट होण्याची भिती हवामान विभागाने वर्तवली आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी?
आज धुळे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली या भागात वादळी पावसाचा अंदाज आहे.

उद्या 26 एप्रिल ते 28 एप्रिल तारखेपर्यंत जळगावला यलो अलर्ट जारी?
दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जळगावला उद्यापासून तीन दिवस म्हणजेच 28 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जळगावात गेल्या आठवड्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मागील तीन चार दिवस पावसाने उघडीप दिली होती परंतु आत पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती आहे. दक्षिण तामिळनाडू आणि परिसरावर 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असल्यामुळे मध्य प्रदेशपासून, महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे.