जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील लाखो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामासाठी हेक्टरी १० हजार रुपये देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला असून यामध्ये जळगावसह सात जिल्ह्यांना नुकसानीपोटी १ हजार ७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील साडेतीन लाखांवर शेतकऱ्यांना सुमारे २७० कोटी ९२ लाखांची विशेष मदत मंजूर झाली आहे

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीने सुमारे दोन लाख ४७ हजार २६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन तीन लाख २५ हजार ३९ शेतकरी बाधित झाले होते. संबंधित सर्व शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी शासनाने २९९ कोटी ९४ लाख ४७ हजार रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

त्यानंतर आता अतिवृष्टीसह पुरामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाणे व इतर अनुषंगिक खर्चाच्या बाबींकरीता प्रति हेक्टरी १० हजार रूपयांची विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे. जो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पोर्टलद्वारे वितरित होणार आहे. विशेष म्हणजे बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदतीचा लाभ दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना मिळालेली नैसर्गिक आपत्तीच्या मदत निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येऊ नये म्हणून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून तशा सूचना बँकांना देण्यात येणार आहेत. नाशिक विभागातील १६ लाख ५९ हजार २९३ शेतकऱ्यांसाठी सुमारे १२११ कोटी ५४ लाख ९० हजार रूपयांचा विशेष मदत निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील तीन लाख ५५ लाख ९७८ शेतकऱ्यांना ऑगस्ट-सप्टेंबरमधील दोन लाख ७० हजार ९२६ हेक्टरवरील नुकसानीबद्दल सुमारे २७० कोटी ९२ लाख ६५ हजार रूपयांची मदत मिळणार आहे.








