जळगाव लाईव्ह न्यूज | १३ जुलै २०२२ | राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक धरण मोठ्या प्रमाणात भरली गेली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीपात्रात 141088 पाण्याचा विसर्ग होत आहे. तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील दोन दिवसापासून रिपरिप पाऊस सुरु आहे. तर हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत हातनूरचे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रात 141088 पाण्याचा विसर्ग होत आहे. इतका विसर्ग सोडण्यात आलेला असल्यामुळे कोणीही नदी पात्रात जाऊ नये अथवा आपले गुरढोरे, नदीपात्रात सोडू नये तसेच आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपत्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात जिल्ह्यात पावसामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.