⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

हनुमान जयंती विशेष : अकबराच्या कोठडीत राहून रचली हनुमान चालीसा, वानरसेनेने घातला होता घेराव

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । सध्या संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात हनुमान चालीसामुळे एकच राजकीय रान उठलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी भर सभेत मश्चिदचे भोंगे वाजणार असतील तर आम्ही त्या-त्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. सध्या हनुमान चालीसावरून भाजप, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना असे शाब्दिक युद्ध सुरु आहे. हनुमान चालीसाचा उल्लेख दररोज होत असला तरी हनुमान चाळीसा केव्हा आणि कुणी लिहिली याचा मागोवा कुणीच घेत नाही. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने जळगाव लाईव्ह टीमने तेच आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणत्या युगात भगवंतांची प्राप्ती सहज शक्य असेल तर ते युग आहे कलियुग. या विधानाची पुष्टी करणारे श्लोक तुलसीदासांनी रामचरित मानसमध्ये लिहिले आहे. तुलसीदास म्हणतात, कलियुग केवल नाम आधारा समीर सुमिर नारउत्तरही परा। याचा अर्थ, कलियुगात मोक्ष प्राप्तीचे एकच ध्येय आहे. ते म्हणजे भगवंताचे नाव घेणे. त्यांनी रामचरित मानस लिहीलं आणि बघता-बघता रामचरित मानस संपूर्ण भारतात पोहोचले. त्यावेळेस भारतावर मुघलांचे साम्राज्य होतं आणि तेव्हाचे सम्राट होते जलालुद्दीन मोहम्मद अकबर.

एकदा अकबराने तुलसीदासांना समोर आणलं आणि त्यांना एक प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव असा होता की, एक तर तुलसीदासांनी श्रीरामाचे दर्शन अकबरला घडवावे किंवा त्याच्या स्तुतीपर अनेक काव्यसंग्रह रचावे. यावर तुलसीदासांनी अकबराला उत्तर दिले कि, श्रीराम प्रभू फक्त भक्तांना दर्शन देतात. यावर अकबर चिडला आणि तुलसीदासांना कैदेत डांबले. तुलसीदासांनी आपल्याला तुरुंगवासातून सोडवावे अशी प्रार्थना भगवान बजरंग बली म्हणजेच हनुमान यांच्याकडे केली आणि त्याच प्रार्थनेला आज आपण हनुमान चालीसा म्हणून ओळखतो.

हनुमान चालीसा आणि तुलसीदासांबाबत असे म्हटले जाते कि, हनुमान चालीसा लिहिल्यावर संपूर्ण फतेहपुर सिक्रीला म्हणजेच कारागृहाला माकडांनी वेढा दिला. ही गोष्ट अकबर यांना समजताच त्यांनी तुलसीदासांना कैदेतून मुक्त केलं आणि क्षणार्धात माकडांचा तो वेढा देखील सुटला. संपूर्ण वानरसेना जंगलात निघून गेली. यानंतर मात्र अकबराला तुलसीदास यांचा महिमा समजला आणि मरेपर्यंत अकबराने तुलसीदासांना चांगली वागणूक दिली.