⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

गुलाबराव पाटलाने कोणतेही खोके घेतले नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । बाळासाहेबांची इच्छा होती मला एक दिवस पंतप्रधान करा मी काश्मीरचे कलम ३७० हटवतो. राम मंदिर बांधण्याची इच्छा बाळासाहेबांची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांच्या माध्यमातून ती पूर्ण केली. आम्ही अभद्र आघाडी नव्हे तर चांगली युती केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला ट्रामा सेंटर मान्यता करण्याची निर्मिती करणे. धरणगाव येथे बालकवी ठोंबरे यांचे स्मारक करणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करायचे आहे. धरणगाव येथे बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक उभारले जाईल अशा घोषणा त्यांनी केल्या. कोळी समाजाचे निवेदन द्या, आपल्याला सर्व समाजाला न्याय द्यायचा आहे. एसटीचे प्रश्न देखील सोडविले जातील. गुलाबराव पाटलाने पन्नास खोके घेतल्याचे आरोप केले जातात. गुलाबराव पाटलाने कोणतेही खोके घेतलेले नाही, त्याला गरज देखील नाही. तो स्वतः एक निष्ठावान सैनिक आहे, असा उच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून दुपारी ५ च्या सुमारास त्यांनी पाळधी येथे जाहीर सभा घेतली. सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आणि जळगावसाठी घोषणा देखील केल्या. प्रसंगी व्यासपीठावर भाजप, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, जळगावात जे-जे प्रश्न आहे ते सर्व मी सोडवणार. शिवसेनेची बुलंद तोफ गुलाबराव पाटलांचा मी चाहता आहे, म्हणून मी त्यांना ठाणे, पालघरला त्यांना निवडणुकीला बोलावतो. शिवाजी पार्कवर गुलाबराव पाटील जेव्हा भाषण द्यायचे तेव्हा नवचैत्यन्य निर्माण व्हायचे. माझ्यापेक्षा त्यांचा भाषण चांगले होईल हि भीती असल्याने गुलाबरावांचे भाषण बंद करण्यात आले. एकनाथ शिंदे नेहमी कार्यकर्त्याला मोठे करतो. आम्ही कार्यकर्त्यांना मोठे करतो म्हणून बाहेरील शिवसेना देखील आम्हाला येऊन मिळाली, असे ते म्हणाले.

गुलाबराव टेन्शन घेऊ नका मी आहे
शिवाजी पार्कच्या सभेत बोलू न देण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटलांना विचारणा केली असता ते मोठ्याने बोलत नव्हते तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, गुलाबराव टेन्शन नका घेऊ आम्ही सोबत आहोत. गुलाबरावाला काटे टोचण्याचे काम कुणी केले हे सर्वांना माहिती आहे. ज्या गुलाबरावाने बाळासाहेबांची शिवसेना मोठी केली त्याचे पाय ओढण्याचे काम देखील त्यांनी केले. टपरीवाला म्हणून गुलाबरावांना हिणवण्याचे काम त्यांनी केले. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे तुम्हाला पचनी पडत नाही, असे ते म्हणाले.

पुढील अडीच वर्षात बोटावर मोजायला देखील शिवसेना शिल्लक राहणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजची गर्दी पाहून वाटले कि आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. कालचे निकाल पाहून कळले कि फक्त अडीच महिन्यात आम्हाला कामाची पोचपावती मिळाली. आम्ही कुठेही काही लक्ष देखील दिले नाही तरी आम्हाला यश मिळाले. तुमच्या सर्वांमुळे हे यश मिळाले. ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है. पुढच्या अडीच वर्षात हाताच्या बोटावर मोजायला देखील शिवसेना शिल्लक राहणार नाही. झोपलेल्या माणसाला जागे करता येऊ शकते पण झोपलेल्याचे सोंग घेतलेल्या माणसाला जागे करता येत नाही. तुम्ही मला तीन प्रश्न द्या. आम्ही निवडणूक भाजप-सेना युती म्हणून लढवली तर सरकार तयार करायला हवे होते पण तसे झाले नाही. आम्ही केले ते बरोबर केले असे जनता आम्हाला म्हणाली, असे त्यांनी सांगितले.

आमच्यामुळे त्यांना गणपती दर्शन झाले
अडीच वर्षात जेवढी कामे त्यांची झाली नव्हती तेवढी कामे आम्ही अडीच वर्षात केली आहे. एकनाथ शिंदे इतका फिरतो आहे हे पाहून ते घाबरले. मी फिरायला लागलो म्हणून ते पण फिरायला लागले. मी फिरायला लागलो म्हणून त्यांना गणपती दर्शन झाले. कुणासोबत देखील फोटो काढायला लोकांना आवडत नाही. लोकांना जो आवडतो त्याचासोबत फोटो काढायला लोकांना आवडते. मी रात्रंदिवस काम करायला तयार आहे. एसटीचा प्रश्न देखील मी सोडवणार आहे. अन्याय दूर केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे थांबणार नाही, असा जाहीर उच्चार त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या एका नेत्याला लगावला टोला
अभद्र युतीच्या विरोधात उठाव केला होता. शिवसेना-भाजप युतीला जनतेने स्वीकारले आहे. आम्ही कामाने उत्तर देऊ. आता ते गोमूत्र शिंपडण्याइतकेच शिल्लक राहिले आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याला मला सांगायचं आहे. आम्ही निवडणुकीसाठी थांबत नाही. एक पत्रकार परिषद घेतली, दुसरी घेतली, तिसरी घेतली, चौथी घेतली, निवडणूक आली तेव्हा पाणी सोडू शकत होते परंतु त्यांनी पाणी सोडले नाही. गुलाबरावांनी २२ हजार पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा इतिहास केला आहे. आम्ही कामाचा खेळखंडोबा करीत नाही. आमचे सर्व मंत्री चांगले काम करतील तुम्हाला न्याय देण्याचे काम करतील. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाऊ. आम्ही ५० लोकांनी जे केले त्याची दखल संपूर्ण देशाने घेतली आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहे म्हणून आम्ही धाडसाने पाऊल उचलतो आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांची इच्छा मोदींनी पूर्ण केली
बाळासाहेबांची इच्छा होती मला एक दिवस पंतप्रधान करा मी काश्मीरचे कलम ३७० हटवतो. राम मंदिर बांधण्याची इच्छा बाळासाहेबांची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांच्या माध्यमातून ती पूर्ण केली. एसटीचे प्रश्न देखील सोडविले जातील. गुलाबराव पाटलाने कोणतेही खोके घेतलेले नाही, त्याला गरज देखील नाही. तो स्वतः एक निष्ठावान सैनिक आहे, असे सांगत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे नाव देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले.