⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

..तर याच्या पेक्षाही चांगलं खातं मिळालं असतं ; अखेर मंत्री गुलाबरावांची खदखद बाहेर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला (Shiv Sena) मोठा झटका बसला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केलं आहे. या मध्ये शिंदे गटातील सदस्य गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना पाणीपुरवठा व स्वच्छता खात मिळाले आहे. मात्र चांगल्या खात्यासाठी थोडासा आग्रह पकडला असता तर याच्या पेक्षाही चांगलं खातं मला मिळालं असतं असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील फुलगाव येथे पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. पण जे चाललंय ते चालू द्या असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे चांगल्या खात्याची अपेक्षा केल्याचे बोलले जात आहे. तसेच आपल्या गावात सुरू केलेल्या योजनेवरून गुलाबराव पाटील यांनी पुढच्या वेळेस गाव मला मतदान करणार की नाही असा संशय व्यक्त केला. गावात पाण्यासाठी डायरेक्ट मिटर बसवल्याचे भाषणात बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे.

तर यावेळी मंत्री पाटील यांनी विरोधकांवरही निशाणा साधत काही लोक आमच्यात मध्ये मध्ये करतात ज्यांना ठराव माहिती नसतो तेसुद्धा आम्ही योजना मंजूर करून आणली असे सांगतात मात्र जन्माला बाळ आम्ही घालायचं आणि बारसं तुम्ही करायचं हा यांचा धंदा असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. मागच्या दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे मिलींद नार्वेकरही शिंदे गटात सामील होणार असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. पाटील हे धुळ्यातील सभेत बोलत होते.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले कि, मी 50 खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे हे मला मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तो देखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.