जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील दोन बलाढ्य नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप, टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहे. अशातच निवडणुकीचा जुना किस्सा सांगत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांना पुन्हा डिवचलं आहे. आपण कशा प्रकारे खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव केला ते गिरीश महाजनांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले मंत्री महाजन?
गिरीश महाजन म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला खडसेंनी माझ्यावर भरपूर तोंडसुख घेतले. नको ते आरोप केले. पण मी सांगितलं होतं तुम्हाला जेवढ्या शिव्या द्यायच्या त्या एकदा देऊन घ्या…मी फक्त एकदा शेवटच्या दिवशी येईल आणि तुमची खाट पाडून टाकेल. अगदी त्याप्रमाणे मी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गेलो. एकच रात्र थांबलो आणि मुक्ताईनगरची खाटच पाडली. खडसेंनी कोट्यवधी रूपये खर्च करूनही मी शेवटच्या दिवशी त्यांचा बरोबर कार्यक्रम केला.

मी-मी म्हणणाऱ्यांचे काय हाल झाले. त्यांची मुलगी दोनवेळा लागोपाठ निवडणुकीत पडली. मी म्हणजे भाजप, मी म्हणजे पक्ष या गुरमित राहिले. आता कशाचे काय राहिले नाही. पक्ष होता म्हणून तुम्ही होते. आता तुमची किंमत झिरो झाली आहे. दूध संघात त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही. बॅंक राहिली नाही, दूध संघ राहिला नाही. नगरपालिका राहिली नाही. आमदारकी राहिली नाही. मी पक्षापेक्षा मोठा आहे अशी हवा जेव्हा डोक्यात जाते तेव्हा तुम्ही मातीत जातात असा टोला गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला.








