जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । राष्ट्रवादीचे नेते हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेत गर्दी झाल्याने शनिपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील गफ्फार मलिक यांच्या तिन्ही मुलांची नावे वगळण्यात यावे अशी मागणी फारुख शेख यांनी केली आहे.
शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात एजाज मलिक, नदीम मलिक व फैसल मलिक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता या तिघी मुलांनी अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी कोणालाही निमंत्रण दिलेले नाही, बोलवले नाही, एवढेच नव्हे तर या तिघा भावंडांना कोरोना हा आजार नाही किंवा जे मृत पावले ते सुद्धा कोरोनाग्रस्त नव्हते तसेच कायद्यानुसार कुटुंबातील कोणी मेला तर त्या घरातील २० लोकांना अधिकृत परवानगी असताना सुद्धा या तिघीही मुलांवर गुन्हा कसा दाखल करण्यात आला? असा प्रश्न फारुख शेख यांनी उपस्थित केला आहे.
तसेच गुन्ह्यातून त्यांची नावे त्वरित वगळावे व त्यांना न्याय द्यावा अशी मागणी जळगाव मुस्लिम व कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना व्हाट्सअप व ईमेल द्वारे निवेदन देऊन केलेली आहे. सदर निवेदनात नुकतेच खासदार राजीव सातव यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्या कळमनुरी पोलीस स्टेशनला कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसल्याचे समजते. तसेच अस्थिविसर्जनला सुद्धा गर्दी असून सुद्धा त्या वेळीही गुन्हा नोंद झालेला नाही असे सुद्धा नमूद केलेले आहे.