जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळ भरधाव आयशर वाहनाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २ सख्ख्या भावांसह ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमनाथ संजय वराडे (वय ३२), सागर संजय वराडे (वय २६) विकी बापूराव खैरनार (३०) असं अपघातातील मृतांची नावे असून या घटनेने हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर हिरापूर गावाजवळ भीषण अपघात झाला. सोमनाथ वराडे व त्याचा लहान भाऊ सागर वराडेसह त्यांचा मित्र विकी खैरनार हे तिघे होंडा शाईन मोटार सायकल क्र. MH 05 Z 8909 या दुचाकीवरून तळेगाव येथून हिरापूरकडे येत होते. त्यावेळी तळेगांवकडून हिरापूरला येत असतांना रात्री 09.30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव कडून नांदगांवकडे जाणारा टाटा कंपनीचा ट्रक क्र. MH 04 HY 7208 चे वरील चालकाने ट्रक बेदकारपणे, भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला.

घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमनाथ संजय वराडे, सागर संजय वराडे आणि त्यांचा मित्र विकी बापूराव खैरनार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेनं ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव इथं पाठवण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी तपासून सोमनाथ संजय वराडे, सागर संजय वराडे आणि त्यांचा मित्र विकी बापूराव खैरनार यांना मयत घोषित केलं. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात वराडे कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.






