जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । आपसातील वाद वाढल्याने पती-पत्नीने विभक्त होण्याचा निर्णय घेत भाेरगाव लेवा पंचायतीकडे अर्ज केला. मात्र, भाेरगाव लेवा पंचायतीने दोघांचे समुपदेशन केले. परिणामी दोघांनी वाद विसरून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर विवाहिता सासरी गेली. यावेळी भाेरगाव लेवा पंचायतीच्या आरती चौधरी यांनी तिला पेढा भरवला.

विभक्त होण्याचा निर्णय घेत रवींद्र चुडामण पाटील ( मु.पो.केऱ्हाळे खुर्द ) व लक्ष्मी चुडामण पाटील ( माहेर मु.पो.वितखेड, जि.वाशिम ) यांनी १४ नोव्हेंबरला भाेरगाव लेवा पंचायतीकडे अर्ज दिला. यानंतर पंचायतीच्या सदस्यांनी दोघांसोबत वेगवेगळी चर्चा केली. त्यात शुल्लक कारणावरून वाद हाेत असल्याचे समाेर आले. याच वादातून लक्ष्मी चार वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली हाेती. मात्र, भोरगाव लेवा पंचायतीने दोघांची समजूत घातली. त्यात दोघांनी आपापल्या चुका मान्य करून आनंदाने संसार करण्यासाठी तयार झाले. रवींद्र आणि लक्ष्मीने एकमेकांना पेढा भरवला.
वाद विसरून किरण-कुंदाही झाले एकत्र
कानळदा ( जि.जळगाव ) येथील किरण विजय राणे व बामणोद येथील कुंदा किरण राणे यांच्या संसारात कुरबुरी व्हायच्या. त्यामुळे कुंदा या माहेरी बामणोदला निघून आल्या त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. भोरगाव लेवा पंचायतच्या भुसावळ शाखेत त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यानंतर त्या पुन्हा सासरी रवाना झाल्या. या विवाहितांना सासरी पाठवताना जणू त्या आमच्या मुलीच आहेत, अशी भावना असल्याचे समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्ष ऍड.प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील, सुहास चौधरी, परीक्षित बऱ्हाटे उपस्थित होते.