⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

जी.एस.ग्राउंडवरील महाराजांच्या पुतळ्याचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव जिल्ह्यात शिवाजी महाराज आले होते. याचे पुरावे मिळतात ते आग्रा स्वारी वेळी. शिवाजी महाराज जेव्हा आगऱ्याला जात होते तेव्हा ते जामनेरहून गेले होते.अशी नोंद इतिहासात आहे. मात्र जळगावच्या जि एस ग्राउंडवर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? नसेल माहिती तर नका वाचा हा संपूर्ण लेख

मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी केले उदघाटन
तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी १९८३ साली शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण केले होते. हा पुतळा तेव्हापासूनच अश्वारूढ असला तरी आजूबाजूला सुशोभिकरण झाले नव्हते. म्हणून ज्येष्ठ शिवसैनिक दादा (दुर्गादास) नेवे यांनी २००८ मध्ये महापालिकेच्या महासभेत या पुतळ्याचे सुभोभिकरण करावे आणि जी. एस. ग्राउंडचे नामांतरण शिवतीर्थ मैदान म्हणून करावे असा ठराव पारित करून घेतला. लगेचच १.५ लाख रुपये खर्चून याठिकाणी या पुतळ्याचे सुशोभीकरण काण्यात आले.

सुरेशदादा जैन यांचा पुढाकार
खास पुण्याहून ‘अतुल पानघंटी’ या शिल्पकारांना बोलावून पुतळ्याच्या चौथऱ्यावर रेखीवकाम करण्यात आले. ही जागा खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेकडे होती. मात्र, माजी आ. सुरेशदादा जैन यांच्या पुढाकाराने ही जागा मनपाकडे हस्तांतरित केल्याची माहिती नेवे यांनी दिली.

शिवजयंती उत्सवाचा इतिहास
जळगाव जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप यांनी पुढाकार घेत जळगाव जिल्ह्यात शिवजयंती उत्सव रुजविला. तत्कालीन जिल्हाधिकारी हे शिवजयंती उत्सवात स्वतः लेझीम खेळायचे. एका उघड्या कारमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात येत असे.