जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह खान्देशात ‘पांढरे सोनं’ मानल्या जाणाऱ्या कापसाचा हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा लवकर आटोपल्याचे चित्र दिसत आहे. साधारणपणे एप्रिलपर्यंत सुरू राहणारी कापसाची आवक यंदा मार्च महिन्यातच कमी झाल्याने बाजारपेठेत कापसाचा हंगाम मुदतीपूर्वीच संपल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय कापूस निगमने (सीसीआय) कापूस खरेदीसाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारपेठांमध्ये कापसाची आवक जवळपास पूर्णपणे थांबली आहे. यामागचं कारण म्हणजे तेथे येणाऱ्या कापसाची गुणवत्ता खराब असल्याचे सांगत माल नाकारला जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत कापसाचे दर घसरल्याने भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात साठवून ठेवला होता.

परिणामी कमी दरात माल विकण्यापेक्षा तो घरातच ठेवणे शेतकऱ्यांनी पसंत केल्याने खासगी जिनिंगमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. खान्देशात अजूनही १ लाख गाठी बनतील एवढा कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. हा शिल्लक माल प्रामुख्याने बड्या शेतकऱ्यांकडे असून, भाववाढीच्या अपेक्षेने त्यांनी तो विक्रीसाठी काढलेला नाही.त्यामुळे बाजार समित्यांमधील कापसाची आवक अपेक्षेपेक्षा कमी राहिली असून हंगाम लवकर आटोपल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.









