जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ भुसावळकडून यावलकडे येताना एका मोठ्या कंटेनर चालकाचा ऐन चढावावर ताबा सुटून अपघात घडला. यात कंटेनर मागे जावून रस्त्याच्या कडेवर अडकला. सुदैवाने हा कंटेनर मागे येणाऱ्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर कलंडला नाही व मोठी दुर्घटना टळली.

अंजाळे (ता. यावल) येथे भुसावळकडून यावलकडे मोठा कंटेनर (आरजे ०९ जीबी ५६३४) हा यावलकडे येत होता. दरम्यान, अंजाळे मोर नदीच्या पुलावरून ते अंजाळेकडे चढावावर आले. दरम्यान, चढावावर वेग कमी झाल्याने कंटेनकर अनियंत्रित झाले व चालकाचा त्यावरील ताबा सुटला व कंटेनर मागील बाजुने वेगात सरकले. कंटेनरच्या मागे एक शाळेचे विद्यार्थी व प्रवाशी असलेली रिक्षा होती. त्यावर ते घडकणार तोचं चालकाने कंटेनरवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत त्यास थांबवले, आणि मोठी दुर्घटना टळली. असे असले तरी यामुळे या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. मोठा चढाव अंजाळेजवळ असून या ठिकाणी रस्त्याला कठडे देखील नाही, तेव्हा येथे कठडे बांधण्यात यावे अशी मागणी आहे. अंजाळे घाटात रस्त्यावर घोकादायक वळणासह मोठा उतार असल्याने या ठिकाणी भुसावळकडून येणारी वाहने हे अतिवेगाने येतात. या वेगाने येथे अनेक लहानमोठे अपघात येत आहेत. तर भविष्यात येथे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर तात्काळ वाहनांचे वेग नियंणत्रित करण्यासाठी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी किमान तीन-चार ठिकाणी गतीरोधक बसवावे अशी मागणी वाहनधारक करत आहे.