⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

नळ कनेक्शन बाबत जळगाव शहरातील नागरिकांनी व मनपा प्रशासनाने सुजाण होण्याची गरज !

जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | जळगाव शहर गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर कॉम्प्लेक्स आणि सोसायटी जळगाव शहरात वाढत आहे. कोणत्याही शहर प्रगती करत तेव्हा त्या ठिकाणी कित्येक मजली इमारती उभ्या राहतात आणि हेच एका प्रगत शहराच उदाहरण म्हणून बघितला जात. मात्र जळगाव शहरात उभे राहत असलेल्या किंवा उभ्या राहिलेल्या याच इमारतीमध्ये नळ कनेक्शन देताना जळगाव मनपा कर्मचार्‍यांची दमछाक होत आहे. कारण प्रत्येक नागरिकाला स्वतःचे असे वेगळे नळकनेक्शन हवे आहे मात्र तांत्रिक दृष्ट्या ते देणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी अतिशय कठीण काम बनले आहे. अशा वेळी नागरिकांनी नळ कनेक्शन बाबत सुजाण होण्याची गरज आहे.

तर होत असा आहे की, गेल्या दीड वर्षापासून कोणत्याही ठोस निर्णय न झाल्याने शहरातील जुन्या अपार्टमेंटमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जुन्या अपार्टमेंट मध्ये कोणत्या पद्धतीने नळाची जोडणी करायची हे निश्चित होत नसल्याचे रहिवासी संतप्त आहेत. मात्र मनपाने ठोस निर्णय न घेतल्याने संतप्त रहिवाशांना मनपा कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागत. यामुळे कित्येकदा मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आणि शहरातील नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.

आजवरचा जळगाव शहराचा इतिहास पाहिला तर जळगाव शहरातील प्रत्येक घराला स्वतंत्र कनेक्शन देण्याची प्रथा जळगाव शहरांमध्ये आहे. याचं कारण म्हणजे जळगाव शहरात आजवर मोठमोठ्या इमारती बांधल्या नाहीयेत. किंबहुना अपार्टमेंट मध्ये राहण्याची जळगाव शहर वासियांना सवय नाहीये. तर दुसरीकडे जळगाव शहरातील नागरिक खास करून अपार्टमेंट मध्ये राहणारे नागरिक आपल्याला स्वतंत्र नळकनेक्शन हवं अशी इच्छा प्रगट करत आहेत मात्र प्रत्यक्ष मनपा कर्मचाऱ्यांना ते देणं शक्य होत नाहीये.

मुंबई-नाशिक-पुणे या सारखी मोठ मोठी प्रगत शहर पाहिली तर त्या शहरात जळगाव शहरातून मोठमोठ्या इमारतती व अपार्टमेंट्स आहेत. एका अपार्टमेंटला एक नळ नळकनेक्शन दिलं जात. ह्या अपार्टमेंटला स्वतःची टाकी बनवणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक घराला जर नळ कनेक्शन द्यायचं म्हटलं तर कोणत्याही महानगरपालिकेला ते परवडणारे नाही उलट अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा या गोष्टीचा पुढे जाऊन भुर्दंडच बसू शकतो. अशा वेळी जळगाव शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या शहरांच्या किंबहुना प्रगत शहरांचा उदाहरण स्वतः पुढे ठेवत प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र नळ कनेक्शन ही मागणी सोडून देणे आवश्यक आहे.

तर दुसरीकडे मनपाला नळ कनेक्शन बाबत ठोस निर्णय घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण ठोस निर्णय न घेतल्यामुळे आतापर्यंत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मनपाने न घेतलेल्या ठोस निर्णयामुळे जळगाव शहरातील कित्येक स्वयंघोषित नेते मनपा कर्मचाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारतात व अरे रावेची भाषा त्यांच्यासोबत करतात. यामुळे आता नळ कनेक्शन बाबत जळगाव शहरातील नागरिकांनी आणि मनपा प्रशासनाने सुवर्णमध्य काढत सुजाण होण्याची गरज आहे.