जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिाकर्यांच्या आदेशान्वये केवळ २५ जणांच्या उपस्थितीतच विवाह करण्याला परवानगी दिलेली आहे. असे असतानाही क्षमतेपेक्षा जास्त लोक जमवून कन्नडरोडस्थित कमलशांती पॅलेज या हॉटेलमध्ये विवाह सोहळा साजरा करणाऱ्या लासूर येथील विवाह सोहळा आयोजकावर आज बुधवारी पालिकेतर्फे ५० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे काहीवेळ येथे वऱ्हाडी मंडळींमध्ये खळबळ उडाली होती.

याबाबत असे की, कन्नड रस्त्यावरील कमलशांती पॅलेज या हॉटेलमध्ये आज लासूर (जि. औरंगाबाद) येथील विवाह सोहळा पार पडत होता. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आली होती. उच्चभ्रू कुटुंबातील विवाह असल्याने अनेक चारचाकी वाहने हॉटेलच्या बाहेर तसेच हॉटेलपासून काही अंतरावर शेतात लावलेली होती. त्यामुळे या विवाह सोहळ्यात २५ पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याची खबर कोरोना प्रतिबंधक पथकाला मिळाल्यानंतर येथे छापा टाकण्यात आला. जवळपास १५० ते १६० वऱ्हाडी उपस्थित असल्याचे आढळून आले.
कोरोना महामारीत शासनाने जारी केलेल्या निर्देशात विवाह सोहळ्यात २५ हून अधिक व्यक्ति उपस्थितीचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. महसूलसह पालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने विवाहाच्या आयोजकांकडून ५० हजाराचा दंड वसूल केला. मंगल कार्यालयाच्या मालकांकडूनही दोन दिवसांपूर्वी पाच हजाराचा दंड पथकाने वसूल केल्याची माहिती देण्यात आली.