जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२५ । जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा सुरक्षा सैन्य दलातील स्वप्नील सुभाष सोनवणे (वय ३९) या जवानाला पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

भडगाव तालुक्यातील गुढे गावातील स्वप्नील सोनवणे हे २०१४ मध्ये भारतीय सैन्य सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती झाले होते. सध्या ते पश्चिम बंगालमध्ये ५७ बटालियन जी. डी. कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते. दरम्यान, बांगलादेशच्या सीमेवरील फ्लड लाईट खांब क्रमांक १७ दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. आणि ते सरळ खाली सिमेंट काँक्रिटच्या तळावर जाऊन पडले. त्यांना तत्काळ सीमा सुरक्षा दलाच्या रुग्णवाहिकेतून सहकाऱ्यांसह बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रात्री साडेआठ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे मृत घोषित केले.

त्यांच्या मागे पत्नी कविता, मुलगी योगेश्वरी, मुलगा रूद्राक्ष, आई कल्पना, विवाहित बहीण असा परिवार आहे. स्वप्नील सोनवणे यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. तर रक्षाबंधनाच्या दिवशीच स्वप्नील सोनवणे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या बहिणीला रडू आवरत नव्हते. तर या घटनेने संपूर्ण गुढे गाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

उद्या होणार अंत्यसंस्कार
दरम्यान स्वप्नील यांचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक पश्र्चिम बंगालमध्ये रवाना झाले आहेत. त्यांचे पार्थिव बीएसएफ ५७ बटालियनचे जवान घेऊन विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर येणार आहेत. यानंतर मंगळवारी (१२ ऑगस्ट) दुपारपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. यानंतर गावी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.










